अहमदनगर : न्यूज कट्टा
तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या आणि पुण्यात असलेली नोकरी सोडून गावाकडे परतलेल्या नवदांपत्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर येथे ही घटना घडली असून या घटनेनंतर संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरला आहे. दरम्यान, या दांपत्याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
वैभव दत्तात्रय आमले (वय २२) आणि स्नेहा वैभव आमले (वय २०) असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैभव आणि स्नेहा या दोघांचं तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघेही नोकरीच्या निमित्तानं पुण्यातील चाकण परिसरात वास्तव्यास होते. दरम्यानच्या काळात या दोघांनीही नोकरी सोडून आपल्या मूळ गावी अर्थात साकुर येथे परतण्याचा निर्णय घेतला होता.
रविवारी मुळा नदीजवळ मांगमळी येथे एका झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने दोघेजण लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी घारगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घारगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सर्व सोपस्कार पूर्ण केले आणि या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून प्राथमिक तपासात आत्महत्येचं कारण पुढे येईल अशी कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही.
या दोघांनी आत्महत्या का केली हे अद्याप उलगडलेले नाही. या घटनेनंतर संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे. नोकरी सोडून आलेलं हे दांपत्य गावाकडे राहत असताना अचानक इतक्या टोकाचा निर्णय का घेतला याबाबत आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.





