बारामती : न्यूज कट्टा
हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून निघालेल्या वडील आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बारामती-मोरगाव रस्त्यावरील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात घडली आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात पित्यासह दोन चिमुरड्या मुलींचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ओंकार राजेंद्र आचार्य (रा. सणसर, ता. इंदापूर, सध्या रा. बारामती), सई ओंकार आचार्य (वय १० वर्षे) आणि मधुरा ओंकार आचार्य (वय ४ वर्षे) अशी या अपघातात मृत पावलेल्या वडील आणि मुलींची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओंकार आचार्य हे आपल्या दोन मुलींसह दुचाकीवरून (क्र. एमएच ४२ बी ४८४४) खंडोबानगर चौकात निघाले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला हायवा ट्रकने (क्र. एमएच १६ सीए ०२१२) धडक दिली. या धडकेत हायवा ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडल्याने ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या मुली सई आणि मधुरा या दोघी गंभीर जखमी झाला होत्या. मात्र त्यांना रुग्णालयात नेतानाच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून त्यामध्ये हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर काही अंतरापर्यंत दुचाकी फरफटत नेल्याचं या दृश्यांमध्ये पहायला मिळत आहे. या अपघातात दोन मुलींसह पित्याचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दुसरीकडे या चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली होती. मात्र स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आता केला जात आहे. या प्रकरणी अधिक तपास बारामती शहर पोलिसांकडून केला जात आहे.





