BARAMATI BREAKING : पगाराची रक्कम न देता मोबाईल काढून घेत मारहाण; नैराश्यातून शिर्सुफळमधील युवकाने केली आत्महत्या, बारामती तालुका पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ..!

बारामती : न्यूज कट्टा

केलेल्या कामाचे पैसे मिळावेत यासाठी वारंवार तगादा लावूनही पगार न देता मोबाईल काढून घेऊन सलग तीन ते चार दिवस मारहाण झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत शिर्सुफळ ग्रामस्थांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

भारत शिवाजी लंगूटे (वय २५, रा. शिर्सुफळ, ता. बारामती) असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, भारत हा शिर्सुफळ येथे गॅरेज चालवत होता. तत्पूर्वी तो येथील मंडप व्यावसायिक जालिंदर कोंडराम आटोळे यांच्याकडे कामाला होता. आटोळे यांच्याकडे भारत लंगूटे याचे पगारापोटी ४५ हजार रुपये येणे होते.

भारत आपले पैसे मिळावेत यासाठी वारंवार आटोळे यांच्याशी संपर्क साधत होता. मात्र आटोळे यांच्याकडून त्याला पैसे मिळत नव्हते. मागील तीन चार दिवसांपूर्वी त्याने पैशांसाठी फोन केल्यानंतर त्याला गावापासून जवळच असलेल्या माळावर बोलावण्यात आलं. त्या ठिकाणी त्याचा मोबाईल काढून घेऊन त्याला मारहाण करण्यात आली. सलग तीन चार दिवस हा प्रकार सुरू होता. त्यातूनच नैराश्य आल्यामुळे भारतने काल सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

घराचं दार उघडलं जात नसल्याचं पाहून त्याच्या आईने शेजाऱ्यांना बोलावून दार तोडलं असता हा आत्महत्येचा प्रकार उघड झाला. त्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत भारतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या दरम्यान, भारतने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून त्यामध्ये जालिंदर आटोळे, संतोष मच्छिंद्र आटोळे आणि शुभम बाळू ताटे या तिघांच्या नावाचा उल्लेख करत ४५ हजार रुपये आणि मोबाईल येणे आहे असे नमूद केले आहे.

या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत शिर्सुफळ ग्रामस्थांनी आज बारामती तालुका पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. संबंधितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका भारतचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेतली आहे. मात्र अद्याप पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रभारी अधिकारी करतात काय..?  

भारतने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून संबंधितांचे नावांचा उल्लेख केलेला आहे. मात्र बारामती तालुका पोलिसांनी अद्याप याबाबत काहीच कारवाई केलेली नाही. बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडून मनमानी पद्धतीने कारभार सुरू असून अन्याय होऊनही अनेकांना न्याय मिळवण्यासाठी या अधिकाऱ्यापूढे खेटे मारावे लागत आहेत. त्यामुळे तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!