बारामती : न्यूज कट्टा
एका कार्यक्रमादरम्यान जेवण वाढत असताना काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या वादावरून १८ वर्षीय तरुणावर हल्ला झाल्याची घटना बारामती शहरानजीकच्या तांदूळवाडी येथे घडली होती. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दि. १८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता सार्थक लक्ष्मण अंबुरे (वय १८, रा. तांदुळवाडी) हा भैरवनाथ मंदिरात पालखीतील भाविकांसाठी जेवण वाढण्याचे काम करत होता. यावेळी गावातील एकाने त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. तो डिलीट करण्यावरून वाद झाला. नंतर पप्पू शितोळे याने त्याला काम असल्याचे सांगून मंदिराच्या मागील बाजूस नेले. तेथे आधीच गणेश सुभाष जाधव, अभिजीत शेळके, अरुण जाधव व अन्य इसम उपस्थित होते. त्यांनी सार्थकला शिवीगाळ करून जबरदस्तीने यश शितोळे यांच्या घराकडे नेण्यात आले. तेथे खाली पाडून गज आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
यावेळी गणेश जाधव याने गचुंडे धरून पिस्तूल काढत जीवे मारण्याची धमकी दिली, तर पप्पू शितोळे याने प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेत सार्थकच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. जीवाच्या भीतीने त्याने तत्काळ तक्रार दिली नव्हती. मात्र, दुसऱ्या दिवशी दुखापतीचा त्रास वाढल्यानंतर त्याने आईसह बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. गंभीर दुखापत केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत तालुका पोलिसांनी तात्काळ पोलीस पथक पाठवून मुख्य आरोपी गणेश सुभाष जाधव (वय ३४) व पप्पू शितोळे (वय ३४, दोघेही रा. तांदुळवाडी) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.
दरम्यान, एक अल्पवयीन मुलास सुद्धा डोक्यात कोयता लागला होता, त्याचे तक्रारीवरून आरोपी सार्थक अंबुरे, आकाश अंबुरे, बापू अंबुरे, पोपट अंबुरे, लखन अंबुरे (सर्व रा. तांदुळवाडी) यांच्यावर गंभीर दुखापत केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस अमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, जितेंद्र शिंदे, मनोज पवार, दादा दराडे, आफरीन शेख यांनी ही कारवाई केली.





