बारामती : न्यूज कट्टा
अजितदादांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. त्यांनी आपलं दु:ख बाजूला ठेवत अजितदादांप्रमाणेच त्यांनीही आपल्या कामाला सुरुवात केली आहे. उद्या शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी त्या बारामतीच्या दौऱ्यावर येत असून सकाळी ९.३० वाजता त्यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच उद्या दिवसभरात त्यांच्या उपस्थितीत विविध बैठकाही पार पडणार असून त्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
२८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. आज त्यांनी पुण्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयी उमेदवारांशी संवाद साधला. येणाऱ्या काळात अजितदादांचा वारसा पुढे चालवण्यासाठी कार्यरत राहण्याची सूचना करत मी कायम तुमच्या पाठीशी राहीन अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. त्यानंतर त्या उद्या शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी ९.३० वाजता सहयोग निवासस्थानी होणाऱ्या जनता दरबाराला उपस्थित राहून त्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. अजितदादा बारामतीत आल्यानंतर नेहमी जनता दरबार घेऊन नागरिकांच्या भेटीगाठी घ्यायचे. त्यांच्या समस्यांचा निपटारा करायचे. आता तीच पद्धत सुनेत्रा पवार यांनी अवलंबल्याचं पाहायला मिळत आहे.





