जालना : न्यूज कट्टा
विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं एक जीप रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत पडली. या घटनेत पंढरपूरहून आषाढी एकादशी उरकून येत असलेल्या सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. आज सायंकाळी जालना जिल्ह्यात हा अपघात झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी गेलेल्या भाविकांची एक जीप राजुरच्या दिशेने निघाली होती. आज सायंकाळी जालना ते राजूर मार्गावर असलेल्या तुपेवाडीजवळ विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात जीप चालकाचे नियंत्रण सुटले. त्यातून ही जीप थेट जवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडली. या घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यातील बहुतांश भाविक हे नेगाव आणि राजूर येथील असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर चंदनझिरा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या भाविकांना बाहेर काढले. यात सहाजणांचा जीव वाचला असला तरी सध्या ते गंभीर जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेनंतर जालना परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





