BARAMATI : पत्रास कारण की.. बारामतीकरांसाठी वैचारीक मेजवानी; रविवारी अरविंद जगताप यांचे गदिमा सभागृहात व्याख्यान

बारामती : न्यूज कट्टा

रसिक बारामतीकरांची अभिरुची अधिक संपन्न व्हावी, प्रतिभावंतांशी त्यांना हितगुज साधता यावे, त्यांचे विचार ऐकता यावेत या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने प्रतिबिंब व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. याच व्याख्यानमालेअंतर्गत रविवारी दि. २३ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द चित्रपट कथा व गीत लेखक अरविंद जगताप रविवारी संध्याकाळी सहा वाजता विद्यानगरीतील गदिमा सभागृहात बारामतीकरांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, गोष्ट छोटी डोंगरावढी,  तू ही रे,  ये रे ये रे पैसा, ठाकरे, बस्ता, येक नंबर, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा या सारख्या चित्रपटांचे लेखन, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, पत्रास कारण की, वारीत चाललो मी या सारखी सुप्रसिध्द गीते, चला हवा येऊ द्या या मालिकेतील पत्र लेखन, गोष्ट छोटी डोंगरावढी, सेल्फी, पत्रास कारण की या सारख्या प्रसिध्द पुस्तकांचे लेखक म्हणून अरविंद जगताप यांची ओळख आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने प्रतिबिंब या व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. यामध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता अरविंद जगताप हे बारामतीकरांशी संवाद साधणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!